पुणे विमानतळावर सोमवारी सकाळी घडलेल्या प्रसंगाने प्रवाशांचे हृदय अक्षरशः दडपून गेले. स्पाइस जेटचे दिल्लीला जाणारे विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या एका तासात तांत्रिक बिघाड आढळला. पायलटने तातडीने निर्णय घेत विमान पुण्याकडे वळवले आणि सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले.
प्रवाशांचा थरकाप
विमानात बिघाड झाल्याचे समजताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. विमानतळावर उतरल्यावर मात्र सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. “विमान वळवले नसते तर अपघात झाला असता,” अशी धक्कादायक माहिती काही अधिकाऱ्यांनी दिल्याचे प्रवाशांनी सांगितले.
विमान कंपनीवर प्रवाशांचा रोष
घटनेनंतर प्रवाशांना कोणतीही योग्य माहिती देण्यात आली नाही. साधा चहा-नाश्ताही देण्यात आला नाही. दुपारपर्यंत दुसऱ्या विमानाची सोय न झाल्याने संतप्त प्रवाशांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. शेवटी उशिरा त्यांना दुसऱ्या विमानातून दिल्लीला पाठवण्यात आले.
प्रवाशांचा आरोप
“प्रवाशांच्या सुरक्षेबाबत विमान कंपनी व प्रशासन अजिबात गंभीर दिसले नाहीत. माहिती लपवून ठेवली गेली. हा निष्काळजीपणा आहे,” असे विमान प्रवासी ॲड. विशाल जाधव यांनी सांगितले.



