मराठा आरक्षणावरून राज्यात उफाळलेल्या संघर्षाची आठवण करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी फडणवीस सरकारला जाब विचारला आहे. ते म्हणाले, “याआधीही मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना आश्वासने देऊन परत पाठवण्यात आले. आता प्रश्न असा आहे की ही आश्वासने नेमकी कोणी दिली होती? आणि ती प्रत्यक्षात पाळली गेली का?”
अमित ठाकरे सोमवारी पुण्यातील मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आंदोलकांना मागच्या वेळी मुंबईतून परत पाठवणाऱ्यांनीच आज जरांगे पुन्हा का आले याचं उत्तर द्यावं.
ते पुढे म्हणाले, “सरकारची जबाबदारी आहे की आंदोलनकर्त्यांना अन्न-पाणी मिळालंच पाहिजे. या प्रश्नाकडे सरकारने गंभीरतेने लक्ष द्यावं. आंदोलक जे मागत आहेत, ते तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे की नाही, हे त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं गेलं पाहिजे. त्यातूनच योग्य तोडगा निघेल.”
अमित ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत अस्थिरता नको आहे, त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे.



