भारतीय निवडणुकांमध्ये पारदर्शकतेचा मुद्दा वारंवार समोर येत असताना आता राजुरा विधानसभा मतदारसंघात मतचोरीचा गंभीर आरोप उभा ठाकला आहे. काँग्रेसने भाजपवर आणि निवडणूक आयोगावर संगनमत करून मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याचा ठपका ठेवला आहे.
गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी माहिती देताना सांगितले की, महादेवपुरा मतदारसंघाप्रमाणेच राजुरामध्येही हजारो बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली. या प्रकरणी एफआयआर दाखल असूनही तब्बल ११ महिने उलटून गेले तरी अद्याप कोणतीही चौकशी किंवा ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला.
बोगस नोंदणीचे धक्कादायक आकडे
कोंग्रेसच्या मते, ऑक्टोबर २०२४ मध्ये अवघ्या १५ दिवसांत ११,६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली. राजुरा मतदारसंघात एकूण ५५ हजार मतदारांची वाढ झाली. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असता त्यापैकी ६८५३ मते डिलिट करण्यात आली. या घोटाळ्याचा तपास होऊन मूळ सूत्रधार उघड व्हावा म्हणून काँग्रेसने IP address, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरची माहिती मागितली, मात्र आजवर ती उपलब्ध करून दिली गेलेली नाही.
उमेदवाराकडून लाखोंची रोकड जप्त
लोंढे यांनी आणखी गंभीर आरोप करताना सांगितले की, भाजपच्या उमेदवाराकडे तब्बल ६१ लाख रुपये आणि निवडणूक साहित्य जप्त झाले, ही कारवाई निवडणूक आयोगाच्या FST पथकाने केली. त्यावर गडचांदूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. मात्र या प्रकरणावरही कोणतीही पुढील हालचाल झाली नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेसचा इशारा
अतुल लोंढे आणि सुभाष धोटे यांनी स्पष्ट केले की, प्रशासन आणि पोलीस तपास टाळत आहेत. “एका महिन्यात कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयीन मार्ग अवलंबू. जनता आणि न्यायालय या दोन्ही आघाड्यांवर काँग्रेस लढा देईल”, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
या संपूर्ण घडामोडींमुळे राजुरामधील मतदार आणि सामान्य जनतेतही संभ्रम आणि असंतोष पसरला असून, निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.





