राहुल गांधी शहरी नक्षलवादाचे पुरस्कर्ते – फडणवीस
देशातील कारभाराच्या विरोधात युवा पिढी आता संविधानिक मार्गाच्या माध्यमातून बंड पुकारेल आणि प्रस्थापित सत्ता उलथवून टाकेल, असे भाकीत लोकसभेतील विरोधीपक्ष नेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांना आपल्या भारत देशांमधील परिस्थितीचे जराही आकलन नाही. त्यामुळेच ते अशी निराधार विधाने करीत आहेत. अशाप्रकारे बंडाची भाषा करून राहुल गांधी हे शहरी नक्षलवादाचे पुरस्कर्ते असल्याचीच वेळोवेळी प्रचिती देत आहेत, अशी टिप्पणी देखील फडणवीस यांनी केली.
मुंबईतील एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांचा यथेच्छ समाचार घेतला. मतचोरी संदर्भात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर नव्याने केलेल्या आरोपात संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांच्या बुद्धीची चोरी झाली आहे हे मी यापूर्वीच सांगितले होते. आता अशा प्रकारचे कपोलकल्पित, बिनबुडाचे आरोप करून राहुल गांधी आपली बुद्धीचोरी झाल्याची देखील वेळोवेळी प्रचिती देत आहेत.
‘पडळकर यांना उज्ज्वल भवितव्य’
गोपीचंद पडळकर हे आक्रमक नेते आहेत. त्यांना उज्वल भवितव्य आहे. परंतु, अनेकदा भावनेच्या भरात हा आक्रमकपणा जरा अधिकच जोर धरतो! जयंत पाटील यांच्या संदर्भात पडळकर यांनी केलेल्या विधानांबाबत मला शरद पवार यांचा फोन आला होता. तत्पूर्वीच, मी पडळकर यांच्याशी संवाद साधून आपल्या आक्रमकतेला मर्यादेत ठेवण्याचा सल्ला दिला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.







