राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे राष्ट्रचेतनेचा ‘पुण्य अवतार’. देशातील प्रत्येक व्यक्तीला जोडणारा आधार!… असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमादरम्यान नवी दिल्ली येथे काढले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज विशेष टपाल तिकीट आणि शंभर रुपयांच्या नाण्याचे प्रकाशन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी संघाच्या देशव्यापी योगदानाचा गौरव केला. नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी संघाच्या राष्ट्रनिर्माणाशी जोडणाऱ्या १०० वर्षांच्या प्रवासाला सलाम केला.
या प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी संघाच्या वाटचालीचा गौरव केला.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, संघावर अनेकदा हल्ले झाले, बंदी घालण्यात आली आणि षडयंत्रे रचली गेली, तरीही स्वयंसेवकांनी कधीही कटुतेला स्थान दिले नाही.
संघाचे कार्य स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘व्यक्तिनिर्माण से राष्ट्रनिर्माण’ हा संघाचा मार्ग आहे. डॉ. हेडगेवार यांनी सामान्य लोकांना निवडून, त्यांना घडवण्याचे काम केले आणि याच प्रक्रियेमुळे सामान्य लोकांनी मिळून असामान्य काम केले. हीच व्यक्तिनिर्माणाची प्रक्रिया आज संघाच्या प्रत्येक शाखेत सुरू आहे, ज्यामुळे १०० वर्षांच्या प्रवासात संघाला आधार मिळाला. नदी, किनाऱ्यावरील गावांना समृद्ध करते, तशाच पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील प्रत्येक क्षेत्रात आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श केला आहे.
विशेष नाणे आणि टपाल तिकिट

या सोहळ्याची सर्वात महत्त्वाची भेट म्हणजे, पंतप्रधान मोदींनी राष्ट्रासाठी संघाचे योगदान दर्शवणारे खास स्मारक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित केले. त्यांनी सांगितले की, या नाण्यावर संघाचे बोधवाक्य ‘राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय, इदं न मम’ अंकित आहे. इतकेच नाही, तर स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेची प्रतिमा कोरण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच, १९६३ च्या परेडमध्ये स्वयंसेवकांच्या सहभागाची आठवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटातून जागवली आहे.







