पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या जपान दौऱ्यावर असून या दौऱ्यात भारत आणि जपान या दोन देशांमध्ये ऐतिहासिक करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अवकाश क्षेत्रातील एक मोठं पाऊल म्हणून मोदींनी टोकियोत जाहीर केलं की भारताची इस्रो (ISRO) आणि जपानची जॅक्सा (JAXA) या दोन अग्रगण्य अंतराळ संस्था एकत्र येऊन चांद्रयान-5 मोहिमेसाठी सहकार्य करणार आहेत.
अवकाश क्षेत्रातील भारत-जपानची मैत्री
टोकियो येथे जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची भेट घेतल्यानंतर मोदींनी दोन्ही देशांच्या अवकाश सहकार्याची घोषणा केली. मोदी म्हणाले, “भारत-जपान युती ही आता पृथ्वीच्या सीमा ओलांडून अवकाशापर्यंत जाणार आहे. ही भागीदारी मानवी प्रगतीचं प्रतीक बनेल.”
मोदींच्या मते, पुढील दशकासाठी दोन्ही देशांनी एक सविस्तर रोडमॅप तयार केला आहे, ज्यामुळे केवळ भारत-जपान नव्हे तर संपूर्ण जगात शांतता आणि स्थैर्य टिकून राहण्यास मदत होईल.
आर्थिक क्षेत्रात मोठा करार
या दौऱ्यात केवळ अवकाश नाही तर आर्थिक क्षेत्रातही महत्त्वाचा करार झाला आहे. मोदींनी माहिती दिली की, पुढील १० वर्षांत जपानकडून भारतात तब्बल १० ट्रिलियन येनची गुंतवणूक होणार आहे. या गुंतवणुकीमुळे भारतातील नवोपक्रम, पायाभूत सुविधा, आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
संरक्षण आणि सुरक्षेतही सहकार्य
भारत आणि जपानने दहशतवाद, सायबर सुरक्षा आणि सागरी सुरक्षेबाबत समान चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी एकत्रितपणे या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचं ठरवलं आहे. यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेला बळकटी मिळेल.
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी यावेळी म्हटलं की, “पुढच्या पिढीसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत-जपानने एकमेकांच्या ताकदीचा उपयोग करणं गरजेचं आहे.”







