पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपामधील संघर्ष नवा नाही. निवडणुकीच्या काळात हा संघर्ष उग्र रूप धारण करतो, तर पक्षांतील नेते एकमेकांवर थेट टीका करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. अशाच पार्श्वभूमीवर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
नेमकं काय म्हणाल्या मोईत्रा?
एका सभेत बोलताना महुआ मोईत्रा यांनी देशातील घुसखोरीच्या प्रश्नावर केंद्र सरकारची निष्क्रियता दाखवून दिली. त्या म्हणाल्या, “देशात रोज हजारोंच्या संख्येने घुसखोरी होत आहे, आपल्या सीमांचे रक्षण केले जात नाही. अशा परिस्थितीत लोकसंख्येवर ताण वाढत आहे, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि जमिनी बळकावल्या जात आहेत.”याच संदर्भात बोलताना मोईत्रा यांनी अमित शाहांचा उल्लेख करत अतिशय तीव्र भाष्य केले. त्यांनी म्हटलं की, “जर परिस्थिती अशीच राहणार असेल, तर अगोदर अमित शाहांचे शीर धडापासून वेगळं करून टेबलावर ठेवायला हवं.”
मोदींच्या भाषणाचा दाखला
मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून झालेल्या भाषणाचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान घुसखोरांमुळे लोकसंख्या वाढत असल्याचं सांगत होते आणि त्याच वेळी गृहमंत्री समोर बसून टाळ्या वाजवत होते. पण प्रत्यक्ष कृती मात्र दिसत नाही.”
भाजपाची प्रतिक्रिया काय?
मोईत्रा यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. केंद्र सरकार आधीपासूनच ‘ऑपरेशन पुशबॅक’ द्वारे बांगलादेशातील घुसखोर व रोहिंग्यांना बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मात्र, तरीही मोईत्रा यांनी केलेल्या या भाष्यामुळे भाजप काय भूमिका घेणार, हे सध्या सगळ्यांच्या लक्षात आहे.
बीएसएफवर प्रश्नचिन्ह
मोईत्रा यांनी आपल्या भाषणात सीमा सुरक्षा दलाच्याही (BSF) कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असताना घुसखोरी थांबत नाही, हे सरकारचं अपयश असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.







