भारताच्या उद्योगविश्वात रिलायन्स इंडस्ट्रीज हे नाव नवं नाही. पेट्रोकेमिकलपासून दूरसंचार, रिटेलपासून ऊर्जा या असंख्य क्षेत्रांत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेल्या या समूहाने नेहमीच ‘भविष्याभिमुख’ गुंतवणुकींवर भर दिला आहे. आता पुन्हा एकदा मुकेश अंबानींनी भविष्याकडे लक्ष वेधणारी घोषणा केली आहे. त्यांनी नव्या उपकंपनीची घोषणा केली असून तिचं नाव “रिलायन्स इंटेलिजन्स” असं ठेवण्यात आलं आहे.
एआय क्रांतीची तयारी
मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) ही घोषणा करताना सांगितलं की, भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) क्षेत्रात जागतिक पातळीवर नेतृत्व करता यावं, हा या नव्या कंपनीचा मुख्य उद्देश असेल. “रिलायन्स इंटेलिजन्स ही कंपनी पूर्णपणे रिलायन्स समूहाच्या मालकीची असेल आणि ती एआयच्या क्षेत्रात नवा मापदंड तयार करेल,” असं अंबानी यांनी स्पष्ट केलं.
कामकाजाचे चार मुख्य आधारस्तंभ
रिलायन्स इंटेलिजन्स चार महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करणार आहे : एआय डेटा सेंटरची उभारणी – गुजरातमधील जामनगर येथे मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारलं जात आहे. विशेष म्हणजे ही केंद्रे अक्षय उर्जेवर चालवली जातील.ओपन-सोर्स व जागतिक भागीदारी – कंपनी जगातील नामांकित टेक कंपन्या आणि ओपन-सोर्स समुदायासोबत काम करणार आहे.जनतेला व उद्योगांना सेवा – भारतातील सामान्य नागरिक, लघु व्यावसायिक, तसेच मोठे उद्योग गट यांना परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह एआय सेवा मिळतील. विविध क्षेत्रांतील एआय उपाय – कृषी, शिक्षण, आरोग्य अशा महत्त्वाच्या क्षेत्रातील समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे उपाय शोधले जातील.
उद्योगविश्वाची उत्सुकता वाढली
या घोषणेनंतर केवळ भारतातच नव्हे तर जागतिक उद्योगविश्वात उत्सुकता वाढली आहे. ज्या वेगाने एआयचा प्रभाव वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर रिलायन्सचं हे पाऊल केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातूनच नाही तर सामाजिक व आर्थिक दृष्टीनेही महत्त्वाचं ठरणार आहे.
आता रिलायन्स इंटेलिजन्स कोणत्या प्रकारे एआयचा वापर करून भारतात ‘नवा डिजिटल क्रांतीचा युग’ सुरू करते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.







